मोठी बातमी! प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार; निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर केले

Maharashtra Local Body Elections : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra Local Body Elections) लवकरच होणार आहेत. यासाठी प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले होते. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर (Election Commission) केला आहे. कालावधीनुसार टप्पानिहाय कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश राज्यातील जिल्हाधिकारी, महापालिका आयु्क्त, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. या वेळापत्रकानुसार महापालिका, नगरपालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्या लागणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या असे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या प्रभाग रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. यानंतर पुढील टप्प्यात आयोगाने नियनबद्ध कार्यक्रम आखून प्रभागांची रचना करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत एक पत्र महापालिकांचे आयुक्त, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.
मोठी बातमी! “अ, ब व क” वर्ग महानगरपालिकेंना राज्य सरकारकडून प्रभाग रचना करण्याचे आदेश
मुंबईसाठी 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत मुदत
मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना करण्यासाठी आयोगाच्या वेळापत्रकानुसार 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी. नंतर अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येईल. यासाठी 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. 11 जूनपासून म्हणजेच कालपासूनच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही पूर्ण करावी लागणार आहे.
अ, ब, क दर्जाच्या मनपा प्रभाग रचनेचे वेळापत्रक
11 ते 16 जून : प्रगणक गटाची मांडणी
17 ते 18 जून : जनगणनेची माहिती तपासणी
19 ते 23 जून : स्थळ पाहणी करणे
24 ते 30 जून : गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे
1 ते 3 जुलै : प्रभाग हद्दींची जागेवर जाऊन तपासणी
4 ते 7 जुलै : प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीच्या सह्या
8 ते 10 जुलै : प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे
22 ते 31 जुलै : प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती व सूचना मागवणे
1 ते 11 ऑगस्ट : हरकतींवर सुनावणी घेणे
12 ते 18 ऑगस्ट : हरकती व सूचनांवरील शिफारशी विचारात घेऊन अंतिम प्रभाग रचना आयोगाला पाठवणे
29 ऑगस्टे ते 4 सप्टेंबर : अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे
राज्यातील महानगरपालिका
बृहन्मुंबई महानगरपालिका (अ+वर्ग), पुणे व नागपूर (अ वर्ग), ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक (ब वर्ग), कल्याण डोंबिवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई (क वर्ग), सोलापूर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर शहर, अमरावती, नांदेड-वाघाळा, कोल्हापूर, अकोला, उल्हासनगर, सांगली, मिरज कुपवाड शहर, मालेगाव, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना महानगरपालिका (ड वर्ग)